राज्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दरानं मदत देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. केंद्रशासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दरानं मदत देण्यात येणार असल्यामुळं पडणारा, वाढीव आर्थिक भार राज्य शासनाच्या निधीमधुन करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. पूर्णत: नष्ट झालेल्या झालेल्या पक्क्या आणि कच्च्या घरांसाठी प्रत्येक घरामागे दीड लाख रुपये मदत देण्यात येईल.
50 टक्के पडझड झालेल्या घरांसाठी 50 हजाराची मदत मिळेल. 25 टक्के पडझड झालेल्या घरांसाठी 25 हजार रुपयांच्या मदतीची तरतूद आहे. अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी आणि झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपडयांकरता प्रति झोपडी 15 हजार रुपये मदत देण्यात येईल. घरगुती वस्तूंच्या नुकसानभरपाईपोटी प्रत्येक कुटुंबाला 5 हजार रुपये मिळतील.
बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 50 हजार, नारळ झाडासाठी 250 तर सुपारी झाडासाठी 50 रुपये मदत देण्यात येइल पण ही मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत मिळेल. स्थानिक दुकानदार, टपरीधारक यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येईल. पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी 25 हजार, बोटींच्या दुरूस्तीसाठी 10 हजार, पूर्णत: नष्ट झालेल्या जाळयांसाठी 5 हजार तर अंशत: बाधित झालेल्या जाळयांच्या दुरूस्तीसाठी 5 हजार रुपये मदत प्रस्तावित आहे.
नुकसान झालेल्या कुक्कुटपालन शेडसाठी प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम किंवा जास्तीत जास्त 5 हजार रुपये मदत देण्यात येईल. वादळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 4 लाख आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अतिरिक्त 1 लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई ज्या दराने देण्यात आली, त्याच दराने भरपाई देण्याचा निर्णय काल झाला. एनडीआरएफ आणि एसडीआरएफमधील तरतुदीनुसार 72 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आराखडा तयार झाला आहे. पण आता भरपाईची रक्कम 252 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
सोशल मीडिया पर अपडेट्स के लिए Facebook (https://www.facebook.com/industrialpunch) एवं Twitter (https://twitter.com/IndustrialPunch) पर Follow करें …