बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमाभागात १ नोव्हेंबर हा  काळा दिवस म्हणून पाळला जातो. सीमाभागातल्या नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यातलं महाविकास आघाडी सरकारचं मंत्रिमंडळ  आज काळ्या फिती बांधून काम करत आहे.

बेळगाव,  कारवार, निपाणीसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा आपला निर्धार असून सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या लढ्याला राज्यातल्या प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून काम सुरु केलं. राज्यातली जनता ही सीमा भागात अडकलेल्या मराठी भाषिक बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. अजूनही कर्नाटक सरकारकडून सीमा भागातल्या मराठी भाषिकांवर अन्याय होत असून, त्याचा निषेध म्हणून हाताला काळी फीत लावल्याचं पाटील यांनी सांगितलं.

बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली आहे. ज्या गावांमध्ये मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे, ती गावंही कर्नाटक राज्यामध्ये गेली असून बेळगावसह अशी ८०० गावं आहेत.

आजही या गावातल्या नागरिकांना महाराष्ट्रात येण्याची आशा आहे. भाषेच्या आधारावर ही गावं महाराष्ट्राला मिळालीच, पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही म्हटलं आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

 सीमा संघर्ष समन्वय समिती, मुंबई आणि अन्य मराठी संघटनांतर्फे मुंबईत काळादिन पाळण्यात आला.
  • Website Designing